रायगड: माझ्या एवढे काम कुणी केले नाही. माझ्या कामाच्या पाव टक्केही काम अनंत गीते यांनी या शहरात केलेले नाही. जाणीवपूर्वक समाजासमाजामध्ये , धर्माधर्मामध्ये अंतर निर्माण केले जात आहे. निवडणूका आल्या की, विरोधी पक्ष संविधान बदलण्याची अफवा पसरवली जाते आहे परंतु संविधान कधीच बदलले जाणार नाही हे लक्षात घ्या पण लोकांच्या मनात संभ्रम पसरवला जात असल्याचे सांगत विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी माजी मंत्री अनंत गिते यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सुनील तटकरे यांची माणगाव शहारात प्रचार सभा पार पडली. या सभेतून त्यांनी आगामी पाच वर्षाचा रोडमॅप देखील सांगितला. लोकांच्या सेवेसाठी पुढील २५ वर्षाचे व्हिजन आपल्याकडे तयार असले पाहिजे हे खासदाराचे काम आहे आणि ते काम मी प्रामाणिकपणे करत आहे. पुढील पाच वर्षांचा रोडमॅपही तयार असल्याचं माणगावच्या जाहीर प्रचार सभेत स्पष्ट केले.
माणगाव शहर वाढतंय… त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गरज वाढत गेली. एकनाथ शिंदे यांनी क्रांतिकारी निर्णय घेतला त्यामुळेच या शहराची गरज काही प्रमाणात पूर्ण करता आली.माणगाव शहरातून जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव ठेवला मात्र त्यावेळी अडचणी निर्माण झाल्या. नाहीतर त्याचवेळी रस्त्याचे रुंदीकरण झाले असते. आता आपण सर्वांनी बायपास रस्ता करायचे ठरवले आहे. आज जी वाहतूक कोंडी होतेय. तुम्ही ज्या पुलाच्या कामाचा समावेश करायला सांगितला तो येत्या अधिवेशनात केला जाईल असे आश्वासन देखील तटकरे यांनी दिले.
दरम्यान, माणगाव येथे विभागीय क्रीडा संकुल मंजूर होऊन पहिल्या टप्प्यातील निविदा निघाली. क्रीडा क्षेत्रामध्ये या माणगावचे नाव या पाचही जिल्हयात क्रीडा संकुलामुळे माणगावचे नाव सर्वदूर पसरले जाईल. अनेकांनी मेडिकल कॉलेज व्हावे अशी मागणी केली. मात्र या माणगावात पुढच्या शैक्षणिक वर्षांत नर्सिग कॉलेज मंजूर केले जाईल असा शब्दही तयांनी दिला.
राजकारणात अपरिहार्यता असते. देशाला अधिक गतिमान करायची आहे. ही महायुती झाली ती सत्तेसाठी झालेली नाही. सत्तेसाठी झाली ती ‘इंडी’ आघाडी आहे. त्यांना नेतृत्वही सांगता येत नाही, ते निवडणूक लढवत आहेत. असा हल्लाबोल देखील तटकरे यांनी विरोधकांवर केला.