राज्यभरात सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे नद्या, नाल्यांना पूरही आला आहे. आता पुणे, कोल्हापूर, पालघर, नाशिक आणि रत्नागिरी या जिल्ह्यांनाही अलर्ट जारी करण्यात आला आहे. 14 जुलैपर्यंत या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आयएमडीने याबाबतची माहिती दिली आहे.
याशिवाय मुंबईमध्येही पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस कायम राहील. मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामानाच्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवस महाराष्ट्रातील घाट भागात अतिवृष्टी होऊ शकते. त्यामुळे या भागात संपूर्ण काळजी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबतच शक्य असल्यास अशा भागांमधून प्रवास टाळण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
नाशिकमध्ये मुसळधार पाऊस – दरम्यान नाशिकमध्ये अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेत नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा इशारा दिला आहे. याशिवाय धोक्याच्या ठिकाणी असलेल्यांनी तातडीने प्रशासनाशीसंपर्क करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं असंही सांगण्यात आलं आहे.