सध्या देशभरात लम्पी आजाराने धुमाकूळ घातला असून, यावरून केंद्रातील मोदी सरकारवर विरोधकांकडून निशाणा साधला जात आहे. यातच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजब दावा केला असून या दाव्याची खिल्ली उडवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायजेरियातून आणणेल्या चित्त्यांमुळे लम्पी आजार पसरला आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
मीडियाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, लम्पी हा आजार नायजेरियातून आला आहे. देशात चित्तेही नायजेरियातून आणले आहे. चित्त्यांच्या आणि गायींच्या अंगावरील ठिपके सारखेच आहेत. मोदी सरकारने जाणून बुजून शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठी चित्त्यांना भारतात आणले, असा आरोप नाना पटोले यांनी केला.
तसेच देशात आज महागाई, बेरोजगारी हे देशासमोरील सध्याचे सर्वात मोठे संकट आहे पण मोदी सरकारच्या काळात नोकऱ्यांची निर्मिती करण्याऐवजी आहे त्या नोकऱ्या संपवण्याचे काम केले गेले, या शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला. ते माध्यमांशी बोलताना असताना त्यांनी केद्रातीलमोडी आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता.
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या युपीए सरकारच्या काळात विकासदर उच्चांकी होता. २४ कोटी जनतेला गरिबी रेषेतून बाहेर काढले होते, पण मोदी सरकारच्या काळात चुकीच्या धोरणांमुळे विकास दर घसरत आहे. २७ कोटी जनता पुन्हा गरिबी रेषेत गेली, बेरोजगारी ४५ वर्षांतील सर्वात जास्त आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही गरिबीबद्दल बोलतात पण त्यातून जनतेच्या हिताचे निर्णय मोदी सरकार घेताना दिसत नाही. काँग्रेस पक्ष तसेच राहुल गांधी सातत्याने हेच मुद्दे मांडून केंद्र सरकारला जाब विचारत असतात. भारत जोडो यात्रेतही महागाई, बेरोजगारी, सामाजिक विषमता हे मुद्दे उचलून धरले जात आहेत. ‘मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर’ अशी परिस्थिती आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.