हर वार पर पलटवार हू मै, युही नही कहलाता शरद पवार हू मै !
बार्शी (सचिन अपसिंगकर)-
निवडणूक आयोगाने आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे संकेत दिल्यामुळे संभाव्य राजकीय रणधूमाळीसाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते सज्ज झाले आहेत.राष्ट्रवादीमध्ये झालेल्या मोठ्या बंडाच्या पार्श्वभूमीवर नूतन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची घोडदौड रोखण्यासाठी राज्याच्या राजकारणातले भीष्माचार्य शरद पवार यांनी कराड पाठोपाठ आपली दुसरी सभा नाशिकमधील येवल्यात घेतली आहे. 1991 साली शिवसेनेतून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या छगन भूजबळ यांनी तब्बल 32 वर्ष शरद पवारांची साथ दिली. शरद पवारांबरोबर त्यांनी राष्ट्रवादीतही प्रवेश केला. कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात भूजबळ यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाबरोबरच गृहमंत्री पदासारखी अनेक महत्वाची पदे भूषविली.
2019 साली महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले तेंव्हा सुद्धा पहिल्यावेळेस मंत्रीपदाची शपथ घेणार्यास राष्ट्रवादीच्या दोन प्रमुख मंत्र्यांमध्ये भूजबळ हे अग्रभागी होते. अजितदादा पवार यांच्या गोटात तिथे काय चालले आहे हे पाहून येतो असे सांगत गेलेले छगन भूजबळ यांनी थेट मंत्रीपदाची शपथच घेतली, एवढेच नव्हेतर अजितदादा पवार यांच्या गटाच्या आमदारांच्या बैठकीत ही भूजबळ यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वावर टीका केली. त्यामुळे नाशिकमध्ये आज छगन भूजबळ यांचे आगमन झाले, त्याच दिवशी शरद पवार यांनी जाहीरसभा घेऊन भूजबळ आणि भाजपावर कोरडे ओढले. भूजबळ यांचा पवार निष्ठेला तिलांजली देऊन अजितदादा गटात झालेला प्रवेश हा शरद पवार यांना नक्कीच जिव्हारी लागला आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुख सतत घरात बसतात म्हणून पक्ष फोडला तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपले पक्षप्रमुख अजिबात घरात बसत नाहीत म्हणत पक्ष फोडला, अशी उपरोधित प्रतिक्रिया सोशल मीडियावर ट्रोलर्णी केली आहे. यातला विरोधाभास, राजकारणामध्ये सत्तापद मिळविण्यासाठी कोणतेही कारण पुरेसे असते, हेच दर्शविणारे आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री व भाजपा आणि राष्ट्रवादीचे दोन उपमुख्यमंत्री यांनी गडचिरोली येथे एका कार्यक्रमात, एकाच व्यासपीठावर एकत्र येऊन आपल्या एकतेचे दर्शन घडविले आहे. अर्थात एका म्यानात तीन तलवारी कशा बसणार याचे उत्तर काळच देणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाच्या मेळाव्यात बडव्यांनी विठ्ठलाभोवती कडे केले आहे अशा आशयाची टीका झाली होती. त्याला उत्तर देताना शरद पवार गटाने नियुक्त केलेले नवे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी मी आणि जयंत पाटील हे बडवे असू तर आम्ही विठ्ठलाला सोडायला तयार आहोत. राष्ट्रवादीच्या परत गेलेल्या आमदारांनी पक्षात परत यावे असे आवाहन केले आहे. आता याच आवाहनाची री-ओढत ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी जर माझ्या मुळे बंड झाले असेल तर मी पक्ष सोडतो असे वक्तव्य केले आहे. आता या दोन्ही नेत्यांना हे पुरेपूर माहीत आहे की पूलावरून बरेच पाणी वाहून गेले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे बंड करणारे नेते आता माघार घेण्याच्या पलीकडे गेले आहेत. राजकारणात अशाप्रकारे कोलाहल निर्माण करावा लागतो आणि स्वत:ला चर्चेत ठेवावे लागते. आव्हाड यांनी राऊत यांना शिवसेना आणि राष्ट्रवादीतला संघर्ष कोणत्या थराला गेला आहे, हे पुरेपूर माहीत आहे. त्याचप्रमाणे शरद पवार यांचे एकेकाळचे सहकारी आणि आता विरोधक मानले जाणार्या, चंद्रराव तावरे यांनी मात्र वेगळीच कलाटणी देणारी टीका पवार काका-पुतण्यावर केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी सिंचन घोटाळ्याच्या बाबतीत केलेल्या टीकेचा रोख लक्षात घेऊन आता पुन्हा अजितदादांच्या इडीच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागू शकतो हे लक्षात घेऊन आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका जाहीर होई पर्यन्त त्यांना वाचविण्यासाठी खुद्द शरद पवार यांनीच हे सर्व राजकीय नाट्य घडवून आणले आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. मात्र शरद पवार यांनी अजित पवार यांच्या दोन्ही गटांनी राष्ट्रवादी हे नाव आणि चिन्ह मिळण्यासाठी केलेली कायदेशीर व्ह्यूरचना, बैठकांचे नियोजन, आमदार व पदाधिकार्यां ची फाटाफुट लक्षात घेतली तर तावरे यांचे हे वक्तव्य वास्तववादी नाही.
नुकत्याच झालेल्या पवार काका-पुतण्यांच्या गटाच्या आमदारांच्या झालेल्या बैठकांमधले आमदारांचे संख्याबळ हे भविष्यात कोणत्या गटाचे वाढते आणि कोणत्या गटाचे कमी होते, यावर दोन्ही गटांची ताकत सिद्ध होणार आहे. लवकरच या घडामोडी होतील.