मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. गोऱ्हे शिवसेना सोडून निघाल्या होत्या. त्यांना मंत्रिपद मिळत नव्हतं. म्हणून त्या शिवसेना सोडून चालल्या होत्या. पण माझ्या शिफारशीमुळे त्या थांबल्या आहेत, असा मोठा खुलासा राणे यांनी केला. डोंबिवलीत पत्रकारांशी संवाद साधताना राणे यांनी केलेल्या विधानाने ठाकरे गटात खळबळ निर्माण झाली आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे गोऱ्हे ताई नाराज झाल्या होत्या.शिवसेना सोडून चालल्या होत्या. मी थांबवलं त्यांना. आठवतं का विचारा त्यांना. मी जे बोलतो ते ऐकल्यावर त्यांना आठवेल, असे राणे म्हणाले. शाहू सावंत आमच्या जवळचे होते. त्यांच्या मुलाने हॉस्पिटल सुरू केले. त्यामुळे या हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी मी डोंबिवलीत आलो.
सावरकरांच्या विषयावरू राणे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. बाळासाहेव ठाकरे हे सावरकरांना का मानत होते हे ना आदित्य ठाकरेंना माहीत आहे, ना उद्धव ठाकरेंना, असा टोलाही त्यांनी लगावला.राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरही राणे यांनी सडकून टीका केली.
इतकी वर्ष सत्ता असून आताच यात्रा करावी वाटते. महाविकास आघाडीची ही यात्रा असली तरी त्यात सगळे पक्ष एकत्र आलेले दिसत नाही. हे फक्त सत्तेसाठी एकत्र आले आहेत, असे राणे म्हणाले. आदित्य ठाकरेही फोटोसाठीच यात्रेत गेले होते.आदित्य ठाकरेंवर मी कधी बोलत नाही.तो बालिश आहे. तो कधी कोणालाही भेटायला जाईल, त्याचा भरवसा नाही, असा टोलाही नारायण राणे यांनी त्यांना लगावला.