मुंबई | नामशेष होणारा शिवसैनिक आम्ही वाचवला आहे. आम्ही ‘धर्मवीर’ घरात घरात पोहचवले. पण काही लोकांना धर्मवीर आवडला नाही.असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात पार पडलेल्या एका कार्यक्रमात केले. शिंदे यांच्यासमोर शक्तिप्रदर्शनासाठी औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांचे समर्थक मोठ्या संख्येने गुरुवारी आले होते.
मात्र रवींद्र नाट्यमंदिरात आयोजित कार्यक्रमात त्यांना मुख्यमंत्र्यांसाठी तब्बल तीन तासाहून अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागली. रात्री साडेबारा वाजेपर्यंत शिंदेंच्या उपस्थितीत मेळावा सुरू झाला नव्हता. अखेर मुख्यमंत्री त्या ठिकाणी पोहचले आणि रात्री पाऊण वाजता हा कार्यक्रम सुरू झाला. त्यावेळी आपल्या भाषणातून समर्थकांचे कौतुक केले.
गुरुवारी भाजपच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्म मुंबईत आल्या होत्या. त्यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री व शिंदे समर्थक आमदार गेले होते. तिथे त्यांना उशीर झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान मध्यरात्री उशीरा कार्यक्रमात पोहचलेल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. आजचा मेळावा ऐतिहासिक आहे आणि आम्ही ऐतिहासिकच कामगिरी केलीय. मध्यरात्री असा मेळावा कोण घेऊ शकत नाही. आज जो कार्यक्रम झाला, राज्यात रात्री दोन वाजता एकही सभा झाली का? या कार्यक्रमाला ते संभाजीनगरहून मुंबईत आले, हे लोकांचे प्रेम आहे.
या कार्यक्रमासाठी रात्री उशिरापर्यंत लोक थकले नाहीत. समर्थन करणाऱ्या सर्वांचा मी आदर करतो.जे काही चाललं होतं त्यात संजय शिरसाट पुढे होते, असं सांगत त्यांनी शिरसाट यांचं कौतुक केलंय. मी शिरसाट यांना विचारतो की तुम्ही मुंबईत असतात मग मतदारसंघात काय करायचं? पण ते बोलले होते, मतदारसंघ ओके आहे, आता पाहिलं तर खरंच एकदम ओके वाटतंय. असं शिंदे म्हणाले.