राज्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱयांचे अतोनात नुकसान झालेले असताना जनतेच्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी पालक मंत्री नाहीत. आपत्ती व्यवस्थापन विभागाला संचालक नाही. मदत व पुनर्वसन खात्याला सचिव नाही, यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दोघेच अख्या महाराष्ट्राचे मालक झालेत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
आपत्ती व्यवस्थापन विभागाला संचालक नेमला जातो. पण अद्याप तो नेमलेला नाही. आपल्याकडे अनेकदा महापूर येतो. पडझड होते. घरे पडतात. तसेच ढगफुटी होऊन धरणे फुटतात. त्यामुळे मदत व पुनर्वसन खात्याला पूर्णवेळ सचिव असणे गरजेचे असते. मात्र अजून तरी पूर्णवेळ सचिव यांना देता आला नाही. हे या सरकारचे अपयश आहे. दोघेच अख्ख्या महाराष्ट्राचे मालक झाले आहेत असा टोला अजित पवारांनी पत्रकार परिषदेत लगावला.
मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करायचा, हा अधिकार राज्याच्या प्रमुखाचा असतो. सर्व विभागांना मंत्री आणि राज्यमंत्री नेमले गेले तर काम लवकर होते. सचिवांना, अधिकाऱयांना सूचना दिल्या जातात. 165 आमदारांचं पाठबळ विश्वासदर्शक ठरावात मिळाले असताना मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी ते का घाबरत? असा सवाल अजित पवार यांनी केला.