हैदराबादमुक्ती संग्राम दिनी सकाळच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते औरंगाबादमध्ये आज हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. मात्र 9 वाजता होणारं हे ध्वजारोहण 7 वाजताच उरकण्यात आले आहे. त्यामुळे याचा निषेध म्हणून शिवसेनेकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी ध्वजारोहण केलेल्या ठिकाणी अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची उपस्थिती पाहायला मिळाली.
17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो. मात्र यावर्षी याच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजारणाच्या वेळेवरून शिवसेना-शिंदे गटातील राजकीय वाद पाहायला मिळाले. दरवर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानात सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. मात्र यावर्षी सकाळी सात वाजताच ध्वजारोहण करण्यात आले. त्यामुळे यावर शिवसेनेने आक्षेप घेतला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे म्हणाले की, दिल्लीतून पातशहा हैदराबादच्या कार्यक्रमाला येणार आहे. त्याच कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा उपस्थित राहायचं होतं. यासाठी औरंगाबादच्या ध्वजहरणाचा वेळ बदलण्यात आला. मुख्यमंत्र्यांची ही भूमिका म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आहे. याचाच निषेध करण्यासाठी आम्ही नऊ वाजता पुन्हा एकदा अभिवादन केल्याचं दानवे म्हणाले.