जालना : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आज शनिवारी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. सरकारने 2 दिवसांत विशेष अधिवशन बोलवून मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या अध्यादेशाला 9 फेब्रुवारीला पंधरा दिवस पूर्ण झाले. मात्र अद्याप सगेसोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्याने आजपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत.
आता माघार नाही…
राज्य सरकारने आंतरवाली सराटीतील गुन्हे अद्याप मागे घेतल्याची बाब निदर्शनास आणून देत त्यांनी यावेळी अध्यादेशाचा लाभ होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा ही जरांगे यांनी सरकारला दिला आहे.यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजातील मुलांना का अडचणीत आणता? आम्हाला अपेक्षा अंमलबजावणीची आहे. आहेत ते पुरावे घ्या असे सरकारला सांगतोय. असलेले पुरावे सरकार का घेत नाही. आता माघार नाही घेणार. उपोषण सुरु राहणार. शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ द्या. शिंदे समितीचे काम युद्धपातळीवर वाढवा. शिंदे समितीला सतत पुरावे सापडायला हवे असे मनोज जरांगे म्हणाले.
तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार
पुढे ते म्हणाले की,सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला लाभ होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, जरांगेंचा इशारा. जोपर्यंत सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा लाभ मराठा समाजाला होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देखील जरांगेंनी दिला आहे.