मुंबई | मणिपूरच्या घटनेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेत बसवण्यात महिलांचा मोठा हात होता. महिलांनीच त्यांचा प्रचार केला. आता महिलाच या सरकारला घरी पाठवतील. देशातील महिलांच्या मनात प्रचंड असंतोष खदखदत आहेत. त्यांना मणिपूरच्या घटनेची प्रचंड चीड आलेली आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते.
पुढे राऊत म्हणाले की, महिला सरकार बदलवून टाकेल हे जे ममता बॅनर्जी म्हणत आहेत ते मला पटतंय. आमच्याकडेही फिडबॅक येतोय. देशातील महिला प्रचंड रागात आहेत. त्यांना वेदना झाल्या आहेत. मणिपूरची घटना असो, कुस्तीपटू महिलांचं प्रकरण असो की देशातील इतर घटना असो, या सर्व प्रकरणात केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घतेली आहे. त्यामुळे देशातील महिलांनी हे सरकार बदलण्याचा निर्णय घेतला आहे असे राऊत यांनी बबलून दाखविले.
मोदींचं सरकार आलं तेव्हा सर्वाधिक प्रचार महिलांनी केला होता. मोदींचं सरकार आणण्यात महिलांचं योगदान मोठं आहे. आता याच महिला सरकारला घरी पाठवतील. आज मणिपूर फाईल कुणी दाखवो, न दाखवो. मणिपूरमध्ये काय घडतंय हे संपूर्ण जग पाहत आहे. मणिपूरमध्ये अशा शेकडो घटना घडल्या आहेत. आर्मीवर हल्ला होत आहे.
सरकार केवळ पाहत आहे. मणिपूरची हालत काश्मीरपेक्षा भयंकर झाली आहे. काश्मीरमध्ये हिंदू-मुसलमान आणि भार- पाकिस्तान केलं जातं. ते मणिपूरमध्ये त्यांना करता येत नाही. मणिपूरमधून राजकीय फायदा होत नसल्याने भाजप शांत आहे. या ठिकाणी जर एखादा मुस्लिम व्यक्ती असता तर आतापर्यंत देशात कहर झाला असता, असं हल्लाच राऊत यांनी चढवला आहे.