अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरात पतसंस्थेचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांवर सडकून टिका केली.जनतेचा विश्वास तुम्ही गमावला असून लोक तुम्हाला शासन करतील, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांना नाव न घेता लगावला.
सहकारी चळवळीचे संरक्षण झाले पाहिजे म्हणून आम्ही गप्पा मारतो. या राज्यातील सहकारी चळवळ संपली कशी? लोकांनी याचं आत्मपरीक्षण करावं. जनतेचा विश्वास तुम्ही गमावला असून लोक तुम्हाला शासन करतील अशी टीका शरद पवारांचे नाव न घेता राधाकृष्ण विखे पाटलांनी केली. शिंदे फडणवीस सरकारने भूविकास बँकेचे साडेनऊशे कोटीचं कर्ज माफ केलं म्हणून काही लोकांचा पोटशूळ उठलाय. तुम्ही सत्तेत होता मात्र तुम्हाला लोकांच्या बोकांडी कायम कर्जच ठेवायचं होतं. कारण मग लोक तुमच्या मागे हिंडले नसते ना?
असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हे वक्तव्य करत त्यांनी शरद पवार मुद्दाम लोकांवर कर्ज कायम ठेवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर, सध्याच्या सरकारचं त्यांनी कौतुक केलं आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजींच्या निर्णयाने कर्जदार शेतकरी मोकळे झाले. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी झाली, असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.