अभिनेता सुबोध भावे आपल्या रोखठोख विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. कोणत्याही गोष्टीविषयी बेधडकपणे बोलणारे सुबोध अशातच पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी शिक्षण आणि राजकारण याविषयी केलेल्या वक्तव्यानं सध्या सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘डीईएस प्री-प्रायमरी स्कूल’तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘शतसूर्याचे तेज’ या लोकमान्यांच्या जीवनकार्याचा वेध घेणाऱ्या नृत्य-नाटिकेचे आयोजन करण्यात आलं होतं. रविवारी 1 ऑगस्ट रोजी झालेल्या या कार्यक्रमाला अभिनेता सुबोध भावे यांनी हजेरी लावली होती.
यावेळी बोलताना सुबोध भावे यांनी बोलताना म्हटलं की, ‘आपण सर्व चांगले शिक्षण घेऊन कायम करिअरच्या मागे धावत आहे. मला चांगली नोकरी कशी मिळेल, विदेशात जाऊन स्थायिक कसं होता येईल, याचाच विचार आपण करत आहोत. ज्या राजकारण्यांची लायकी नाही, अशांच्या हातात आपण देश उभारणीचे काम दिले आहे’.
‘चांगला देश निर्माण करायचा असेल तर येणाऱ्या पिढीला चांगलं शिक्षण देऊन राष्ट्रीय शिक्षणाचा पाया रुजवावा लागेल. राजकारण्यांच्या हातात देश देऊन काहीही होणार नाही. ते सगळेजण काय करतात हे आपण रोजच पाहत आहे’, असा खोचक टोलाही त्यांनी राजकारण्यांना मारल्याचं पहायला मिळालं. सुबोध भावेंनी केलेलं हे वक्तव्य सध्या जोरदार चर्चेचा विषय ठरतंय