कोल्हापूर | कोल्हापूर विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीचे काम पूर्ण करून लवकरच लोकार्पण करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली. भाजपच्या लोकसभा मतदारसंघ प्रवास योजनेचा एक भाग म्हणून ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत, त्यानुसार प्रत्येक मंत्र्याला एक लोकसभा मतदारसंघ देण्यात आला आहे, जिथे पक्ष 2024 च्या निवडणुकीत लढेल.
गेल्या तीन महिन्यांत शिंदे यांनी तीनवेळा कोल्हापूरला भेट दिली आहे. अलिकडेच त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोल्हापूर-बंगळूर-कोईम्बतूर विमानसेवेचे उद्घाटन केले. कोल्हापूर ते राज्याची राजधानी मुंबई दरम्यान नियमित विमानसेवेमुळे प्रवासी आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले. ज्योतिरादित्य शिंदे पुढे म्हणाले, “लोक आनंदी होते. मला आनंद आहे की उड्डाणे नियमितपणे सुरु आहेत. लवकरच, आम्ही कोल्हापूर विमानतळावरील कामांचे उद्घाटन करु.” असे म्हंटले आहे.
तसेच कोल्हापूर ते जयपूर या मार्गावर विमान सेवा सुरु करावी, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष सुनिल महाजन यांनी केली. याबाबतचे निवेदन ज्योतिरादित्य शिंदे यांना इचलकरंजी दौऱ्यात देण्यात आले. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार सुरेश हाळवणकर उपस्थित होते.
काय आहे मागणी
जिल्ह्यात साखर कारखानदारी, सहकारी सूतगिरण्या, फौंड्री उद्योग आणि वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात आहे. इचलकरंजी वस्त्रोद्योग केंद्रही जिल्ह्यात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक उद्योजक तसेच इचलकंरजीचा थेट दैनंदिन संबंध राजस्थानबरोबर येत असतो. त्यामुळे जिल्ह्यातून या राज्यात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या प्रवाशांना ये-जा करण्यासाठी रेल्वे अथवा रस्ते वाहतुकीवर अवलंबून राहावे लागते.
विशेषतः रेल्वे बंगळूरहून येत असल्यामुळे आरक्षणाच्या उपलब्धेवर मर्यादा पडतात. त्यामुळे जयपूर विमान सेवेची नितांत गरज आहे. या मार्गावर विमान सेवा सुरु झाल्यास स्थानिक उद्योजक, व्यापारी आणि प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन उद्योगाला चालना मिळणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाच्या उडान योजने अंतर्गत कोल्हापूर जयपूर ही विमानसेवा सुरु करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.