एकनाथ शिंदे यांच्या बंड मध्ये सहभागी असलेल्या आमदारांना विरोधकांनी चांगलंच धारेवर धरलं होतं. ५० खोके एकदम ओके, असा नारा विरोधकांनी लावला.
तर वारंवार खोके म्हटल्यामुळे संतप्त शिंदे गटाने विरोधकांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला. यानंतर एकनाथ खडसे यांनी केलेल्या वक्तव्याने खडसेंनी माघार घेतल्याचं दिसत आहे.
गुवाहाटीपासून खोक्यांची सुरुवात झाली आणि शिंदे गटाचे आमदार ज्यावेळी गेले होते तेव्हा त्यांनीच खोक्यांचा विषय काढत सूचक वक्तव्य केलं होतं, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. तसेच खोक्यांचा व्यवहार हा आतला व्यवहार असतो. त्यामुळे खोके घेतले की नाही घेतले याला पुरावा असू शकत नाही. खोके आणि पेट्यांचा व्यवहार झाला, हे शिंदे गटाच्या आमदारांनीच सांगितलं होतं, असं देखील ते म्हणाले.
दरम्यान, खोके घेतले म्हणजे तुम्ही पैसे घेतले, असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे मानहानीची नोटीस दिल्यास सत्य जनतेच्या समोर येईल, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. एवढंच नाही तर या आमदारांमुळेच खोक्यांचा विषय हा जनतेपर्यंत पोहोचला. त्यामुळे खोके घेतले किंवा नाही घेतले हे पुराव्यानिशी देणं हे अत्यंत अवघड आहे. मग मानहानीचा दावा कशासाठी? असा सवाल खडसेंनी केला आहे.