राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत असल्याचं ट्वीट केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अशातच पोलिसांनी 72 तासांत माझ्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही या ट्वीटमधून जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारमधले गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत एक मोठा बॉम्ब फोडला आहे. आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट केलं आहे. पोलिसांनी 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, असं जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट केलं आहे.
हर हर महादेव सिनेमावरुन विवियाना मॉलमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. तर काल कळवा-मुंब्रा नवीन पुल उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान महिलेनं विनयभंगाचा आरोप केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हे दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं ट्वीट केलं आहे.