कोल्हापूर | स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आज, शनिवारी २१ वी ऊस परिषद येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर होत आहे. गत हंगामातील एफआरपी अधिक दोनशे रुपये, कारखान्यांची काटामारी आणि यावर्षी तुटणाऱ्या उसाला एकरकमी एफआरपी व ज्यादाचा दर या तीन मुद्द्यांवर आंदोलनाची दिशा या ऊस परिषदेत ठरणार आहे.
त्यामुळे या परिषदेकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर साखर कारखानदारांचे लक्ष लागून राहिले आहे. ही परिषद ऐतिहासिक होण्यासाठी स्वाभिमानीने नियोजन केले असून, मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून महापूर, कोरोना, अवकाळी पाऊस, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गतवर्षी एफआरपी अधिक दोनशे रुपयांची मागणी स्वाभिमानीने केली होती. एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी राजू शेट्टी यांनी ‘जागर एफआरपीचा, संघर्ष ऊस दराचा’ यातून दौरे केले आहेत. ऊस परिषदेची जनजागृती करण्यात आली आहे. त्यामुळे या परिषदेकडे राज्यासह सीमाभागातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.