मुंबई । राज ठाकरे यांच्या काळाच्या टिकेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला होता. जशी स्क्रिप्ट आली असेल तशी त्यांनी ती वाचली असेल, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. या टिकेमुळे पुन्हा उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्यात वाद होण्याचे चिन्ह दिसून येत आहे.
माहीम इथल्या समुद्रातील अनधिकृत बांधकामाबाबत राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात म्हटले होते, याबाबत प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘बांधकाम आधीपासूनचे होतं ते काही नवीन नाही. त्यांच्या पक्षाचे आमदार, नगरसेवक होते त्याच्या आधीपासूनचे ते बांधकाम आहे. जशी स्क्रिप्ट आली असेल तशी त्यांनी ती वाचली असेल. एवढी वर्ष कारवाई होत नाही आणि तातडीने कारवाई होते तर अशा अनेक गोष्टी असतील, ज्यांच्याबद्दल त्यांना कळवा ते पत्र लिहितील आणि कारवाई होईल.’
वैयक्तिक टीकेबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गेली 18 वर्ष तीच रेकॉर्ड घासूनपुसून झाली आहे. गेल्या वर्षी 14 मे रोजी बीकेसीमध्ये झालेल्या सभेमध्ये जे मत मांडलं होतं, त्यात ज्या चित्रपटाचा दाखला दिला होता; तोच तुम्ही पुन्हा बघू शकता. उद्धव ठाकरे हे गुरुवारी विधीमंडळात आले तेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्यांच्यासोबत होते.
या दोघांमध्ये मुख्य दारापासून सदनाच्या पायऱ्यांपर्यंत जाईपर्यंत मनमोकळी चर्चा झाली. या चर्चेत काही राजकीय गणितांबाबत चर्चा झाली का असा पत्रकारांनी प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘पूर्वी खुलेपणा होता. आता बंददाराआड चर्चा फलदायी होते असं म्हणतात. जर आमची कधी बंददाराआड चर्चा झालीच तर तेव्हा बोलू. मी आणि ते प्रवेशद्वारातून प्रवेश करताना राम..राम, हाय हॅलो होतं, तसं ते तेव्हा झालं.’