मुंबई : माथाडी कामगारांच्या सर्व प्रश्नांची आणि मागण्यांची आपल्याला जाणीव असून माथाडींचे प्रत्येक स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी सरकारची असल्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच कष्टकरी माथाडी कामगारांच्या हक्काच्या घराची योजना मार्गी लावण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची चित्रफीत दाखविण्यात आली. यावेळी राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार प्रसाद लाड, शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील यांच्यासह माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावणार
अण्णासाहेब पाटील महामंडळाला काहीही कमी पडू देणार नाही हे सरकार पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, माथाडी म्हणजे जिद्द आणि कष्टाचे प्रतीक आहे… यात चिवटपणा आणि संघर्षही आला. अण्णासाहेबांची ही परंपरा तितक्याच जिद्दीने आणि तडफेने पुढे नेण्याचे काम नरेंद्र पाटील करत आहेत.
माथाडी हॉस्पिटलचे कामकाज असेल, माथाडी कायद्यातील त्रूटी दूर करणे असेल, कामगार नोंदणी आणि कार्यक्षेत्राच्या मर्यादेचे नियम असतील, माथाडी कामगारांनी पतसंस्थांकडून घेतलेले कर्ज असेल या सगळ्यांची माहिती आपल्याला आहे. आपल्यातील एकजूट जपत आपल्याला समर्थ आणि सशक्त महाराष्ट्राचे स्वप्न जे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्व. अण्णासाहेबांनी पाहिले होते ते पूर्ण करायचे आहे.