गरुडझेप संघटनेच्या वतीने आयोजित आग्रा ते राजगड मोहिमेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या शुभेच्छा
पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणादायी जीवनातील आग्र्याहून सुटका हा अतिशय रोमहर्षक क्षण! महाराज या प्रवासात किंचितही न डगमगता येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना तोंड देऊन जिजाऊ मॉंसाहेब यांच्यापर्यंत पोहोचले. शिवछत्रपतींच्या या महापराक्रमाला अभिवादन करण्यासाठी, तसेच महाराजांचा जाज्वल्य इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी गरुडझेप संघटनेच्या वतीने आग्रा ते राजगड मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. कोथरुड मधील शिवस्मारक येथून संघटनेचे सर्व स्वयंसेवक मोहिमेसाठी रवाना झाले. यावेळी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून मोहिमेसाठी शुभेच्छा दिल्या.

शिवरायांनी आग्र्याहून राजगडाच्या दिशेने घेतलेल्या गरुड झेपेला ३५७ वर्षे पूर्ण होत असून या निमित्ताने हे शेकडो मावळे १२५० किलोमीटर हाती शिवज्योत घेऊन राजगडाकडे धावत येणार आहेत. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र या चार राज्यातील ५७ शहरातून हे मावळे धावणार आहेत.
यामोहिमेची सुरवात कोथरूड शिवस्मारक येथून आज करण्यात आली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये या मोहिमेचा शुभारंभ झाला. यावेळी पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला नमन केले आणि मोहिमेचा भगवा ध्वज उंचावला.
यावेळी पाटील यांच्या समवेत माजी नगरसेवक योगेश मोकाटे, कोथरूड भाजपा अध्यक्ष पुनीत जोशी, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर आणि शिव प्रेमी उपस्थित होते.