मुंबई | आज शिवसेनेचा 57 वा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्त उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करत विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वर्धापनदिन होणार आहेत. याच विषयावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज शिवसेना पक्षाचा ५७ वा स्थापना दिवस आहे. या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पारंपारिक वर्धापन दिन माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणार आहे.
या दोन्ही वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाच्या कार्यक्रमावर सडकून टीका केली आहे. “त्यांना शिवसेनेच्या स्थापना दिवसाची तारीख माहिती नाही. ते शिवसेनेवर दावा सांगत आहेत,” अशी खरमरीत टीका संजय राऊत यांनी केली आहे.
राऊत म्हणाले की, “शिवसेनेचा आज ५७ वा वर्धापन दिवस आहे. या 57 वर्षात अनेक चढ- उतार आले. कठीण काळानंतरही शिवसेना पुन्हा उभी राहिली. शिवसेनेनं दिल्लीपर्यंत धडक मारली. देशाच्या अनेक प्रश्नांमध्ये शिवसेनेनं योगदान दिलं. जम्मू काश्मीरपर्यंत शिवसेना गेली. त्यामुळे ज्यांना वाटत या गद्दारांच्या बंडामुळे शिवसेना संपेल तर तसं होणार नाही. शिवसेना पुन्हा उभी राहिल,” असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
तसेच याबद्दल पुढे बोलताना संजय राऊत यांनी “त्यांना शिवसेनेच्या स्थापना दिवसाची तारीख माहिती नाही. ते शिवसेनेवर दावा सांगत आहेत. निवडणूक आयोगाकडून कागद आणत आहेत. बोगस सातबारा! . हा अब्दुल सत्तारनं लिहिलेला सातबारा आहे, 59 वा वर्धापन दिन. यांना तारीख माहिती नाही,” असे म्हणत शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.