गद्दारांना त्यांची खरी जागा जनताच दाखवे
शिवसेनेतून गेलेले बंडखोर गद्दारच आहेत व ते गद्दारच राहणार. जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. ठाकरे कुटुंबीयांना एकटे पाडू पाहणाऱ्यांनी येथे येऊन पहावे की हा महाराष्ट्र आमच्या पाठीशी आहे, अशा शब्दांत शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोर नेत्यांवर साधत टीका केली.
शिवसेनेत फूट पडल्यापासून शिवसेना नेते युवासेनाप्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सर्वच जिल्ह्यात त्यांच्या संवाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कात्रज येथे आज त्यांच्या संवाद यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यावेळी ते बोलत होते. संवाद यात्रेकरीता मोठ्या प्रमाणात युवकांनी गर्दी केली होती. मोठ्या जल्लोषांमध्ये ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे नेते सचिन आहेर, नीलम गोऱ्हे, महादेव बाबर, संजय मोरे, गजानन थरकुडे, विजय देशमुख, संभाजी थोरवे, कल्पना थोरवे, बाळा ओसवाल, बाळासाहेब चांदेरे, प्रशांत बधे, रघुनाथ कुचिक आदी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, आज काही गद्दार फिरत आहेत, त्यांनी हे वातावरण पाहावं. महाराष्ट्रात काय परिस्थिती चालू आहे आणि यांचे काय चाललंय. हे दोन लोकांच सरकार आहे. मंत्री पदाच्या लायकीचा माणूस एकही नाही. हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. यावेळी सचिन अहिर, शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनीही भाषण केले.