अभिनेता अक्षय कुमार आणि त्याच्या खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टी आजवर चाहत्यांसमोर आल्या आहेत. मग ते त्याचे अफेअर्स असो किंवा वैवाहिक आयुष्यातील घडामोडी. पण, तुम्हाला माहितीये का अक्षयमुळेच एका अभिनेत्रीचं लग्नही मोडलं होतं? आपल्या सौंदर्यानं 90 च्या दशकात प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारी ही अभिनेत्री एकाएकी बॉलिवूडपासून दूर गेली. त्यामागेही काही कारणं होती. ही अभिनेत्री आहे, पूजा बत्रा. अक्षय कुमारनं जेव्हा हिंदी कलाजगतामध्ये पाऊल ठेवलं होतं तेव्हा त्याची पहिली ओळख पूजाशीच झाली होती. त्यावेळी पूजा एक सुपमॉडेल होती. तिच्याच माध्यमातून तो काही फिल्मी पार्टीनाही जाऊ लागला होता. असं म्हणतात की अक्षयच्या कारकिर्दीची सुरुवात होण्याआधी त्या दोघांची जवळीक होती. पण, तिथे खिलाडी कुमारला प्रसिद्धी मिळू लागली आणि त्यानं पूजापासून दुरावा पत्करला.
पुढे या अभिनेत्रीनं 2002 मध्ये ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सोनू एस आहलूवालियाशी लग्न केलं. पण, 2011 मध्येच त्यांचा घटस्फोट झाला. लगनानंतर पूजानं कलाजगताशी दुरावा पत्करला पण, ती लग्न मात्र वाचवू शकली नाही. अक्षय कुमारमुळंच तिच्या वैवाहिक नात्याला तडा गेला होता.
लग्न तुटण्याची आणखी एक बाजूही समोर आली, जिथं पूजावर आई होण्यासाठी पतीकडून दबाव टाकण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पूजानं पुन्हा कधीच तिच्या या अपयशी नात्यावर वक्तव्य केलं नाही. नात्यांमध्ये मिळालेल्या या आघातातून सावरत असतानाच अखेर पूजा बत्राला तिच्या हक्काचं माणूस भेटलं. अभिनेता नवाब शाह याच्यासोबत ती 2019 मध्ये विवाहबंधनात अडकली.
‘विरासत’, ‘भाई’, ‘हसीना मान जाएगी’, ‘नायक’, ‘दिल ने फिर याद किया’, ‘जोड़ी नं. वन’ या चित्रपटांमध्ये काम करणारी पूजा आता मात्र तिच्या या वैवाहिक नात्याला आणि स्वत:ला प्राधान्यस्थानी ठेवताना दिसत आहे. नवाब आणि तिचं नातंही दर दिवशी अधिकाधिक घट्ट होताना दिसत आहे.