मुंबई | शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकीय वातावरण गरम झाले असताना दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांकडून राजकीय नेत्यांची चौकशी सुरू आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडी ने आज चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. मात्र, संजय राऊत आज चौकशीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे राऊत आज चौकशीसाठी हजर राहणार नाहीत. राऊत यांना पत्राचाळ प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे.
ईडी समन्सनंतर संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत म्हटलंय की, “मला आताचा समजलं ED नं मला समन्स पाठवलं आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी… हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या… मला अटक करा! जय महाराष्ट्र!” असं ट्विट करत त्यांनी हे ट्वीट करत देवेंद्र फडणवीसांना टॅग केलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार पत्राचाळ जमीन घोटाळा १,०३४ कोटी रुपयांचा आहे. नेमका काय आहे हा घोटाळा, हे जाणून घेऊया. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचं काम देण्यात आलं होतं. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.
प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे ३ हजार फ्लॅट बांधकाम करायचं होतं, त्यापैकी ६७२ फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर एचडीआयएलला विकले.