मुंबई : देशात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. बरे होणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढत असले तरीही संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे, लोकांना योग्य उपचार मिळत नाहीत. रुग्णांची ट्रेसिंग व्यवस्थित केली जात नाही. तसेच डॉक्टरांनादेखील काम करण्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत अशी ओरड बिहारमधून येत आहे. १३ कोटी लोकसंख्या असणाऱ्या बिहारमध्ये चाचण्या घेण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
अशातच बिहारमधील भागलपूर जिल्ह्यामध्ये एक व्यक्ती आजारी असल्याने औषध घेण्यासाठी मेडिकलमध्ये गेला आणि मेडिकलच्या दरवाज्यातच त्याच्या मृत्यू झाला. सकाळी १०:१५ च्या सुमारास मृत्यू झालेल्या या व्यक्तीचा मृतदेह दुपारी साडेचार वाजेपर्यंत पाच तास, मेडिकलच्या दारातच पडून होता.
स्थानिक लोकांनी दवाखान्यात रुग्णवाहिकेसाठी फोन केले परंतू रुग्णवाहिका पाच तासाने घटनास्थळी दाखल झाली, एक रुग्णवाहिका आधीदेखील आली होती. परंतु कोव्हिड पेशंट असावा या भीतीने तिथून निघून गेली. शेवटी पाच तासानंतर त्या व्यक्तीचा मृतदेह तिथून हटवण्यात आला. त्या पेशंटचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे. पाच तास मृतदेह तिथेच पडून राहिल्याने प्रशासनाच्या कामगार पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
याच भागलपूर मध्ये मागे चाचणी यंत्रात काही बिघाड झाल्याने तब्बल एक महिना चाचण्या बंद राहिल्या होत्या. भागलपूरचे जिल्हाधिकारी आणि त्यांची पत्नी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यांनतर ज्यांना त्यांच्या जागेवर चार्ज देण्यात आला ते देखील कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. बिहार भागलपूर मधील या घटना जितक्या धक्कादायक आहेत तितक्याच वेदनादायी आहेत. लोकांच्या जीवाशी सातत्याने खेळ होत असताना प्रशासन यंत्रणेवर वारंवार प्रश्नचिन्ह उभं राहत आहे.