मुंबई: नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे विरुद्ध महापौर संदीप जोशी वाद राज्यभरात गाजत आहे. मुंडे यांच्या कार्यशैलीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील आक्षेप घेतला आहे. याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला असता त्यांनी मुंडे याचं समर्थन केले आहे.
सामनाचे कार्यकारी संपादक खा संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. याचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला आहे. यावेळी तुकाराम मुंढे आणि नगरसेवकांमध्ये वाद सुरु आहेत. इतकेच काय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशीही त्यांनी पंगा घेतलाय. तुम्ही तुकाराम मुंढेंच्या मागे आहात की लोकनियुक्त महापालिकेच्या? असा प्रश्न विचारला असता या प्रश्नाचं उत्तर देताना तुकाराम मुंढे शिस्तप्रिय असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
एखादा अधिकारी कठोर किंवा कडक असेल, पण त्याच्या कठोरपणाचा तुम्ही लोकांच्या हितासाठी उपयोग करुन घेत असाल तर वाईट काय? त्या वेळी त्यांनी काही नियम, काही कायदे कडकपणाने अमलात आणवले हे काही जणांना परवडत नसेल. पण तुकाराम मुंढेंनी एखादी गोष्ट कडकपणाने अमलात आणली तर अशा अधिकाऱ्याच्यापाठी सर्वांनी उभं राहायला पाहिजे”, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
महाविकास आघाडी सरकार हे रिक्षासारखंच
महाविकास आघाडी सरकार हे रिक्षासारखंच आहे. या रिक्षाची स्टेअरिंग माझ्याकडे आहे, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष पाठीमागे बसले आहेत”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
ठाकरे पुढे म्हणाले, रिक्षा गरीबांचं वाहन आहे. बुलेट ट्रेन की रिक्षा यात निवडायचं झालं तर मी रिक्षाच निवडेन. मी गरीबांच्या मागे उभा राहीन. ही माझी भूमिका मी बदलत नाही. कोणी असा समज करून घेऊ नये की, आता मी मुख्यमंत्री झालो म्हणजे बुलेट ट्रेनच्या मागे उभा राहीन. नाही, मी एवढंच म्हटलंय, मी मुख्यमंत्री या नात्याने सर्वांगीण विचार करेन. माझं मत मी लोकांच्या सोबत असल्याने बुलेट ट्रेन नको हे आहेच, पण आतासुद्धा सगळय़ांच्या मताने बुलेट ट्रेन नको असेल तर मी नाही करणार. म्हणून तीन चाकं तर तीन चाक ती चालताहेत ना एका दिशेने. मग तुमच्या पोटात का दुखतंय!
दरम्यान, केंद्रात किती चाकं आहेत? आमचं तर हे तीन पक्षांचं सरकार आहे. केंद्रात किती पक्षांचं सरकार आहे, सांगा ना! मी जेव्हा गेल्या वेळी एनडीए मीटिंगला गेलो होतो तेव्हा तर 30-35 चाकं होती. म्हणजे रेल्वेगाडी होती, असा टोलाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.
मुख्यमंत्री राष्ट्रवादीला झुकतं माप देत आहेत
कॉंग्रेसचा एक प्रेमळ आक्षेप सुरुवातीला होता, पण तो गैरसमज मी मध्ये भेटल्यानंतर दूर झालेला आहे आणि तो आक्षेप अगदी तीक्र नव्हता. शेवटी असं आहे, सगळेच जण निवडणुका लढवून निवडून येत असतात. जनतेच्या काही अपेक्षा त्यांच्याकडून असतात. म्हणून तर जनता त्यांना मत देते आणि त्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही, असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांची ती चूक आहे अशातला भाग नाहीय. तशा आशाअपेक्षा व्यक्त करणं हा गुन्हा नाहीय. तुम्ही म्हणता तसं सुरुवातीच्या काळात त्यांच्या मनात काही असेलही, पण माझ्याशी कुणी असे ठामपणाने बोलले नाही की, तुम्ही आम्हाला विचारत नाही. माझा पवारसाहेबांशी पण चांगला संवाद आहे. अगदी नित्यनियमाने नाही, पण कधीतरी मी सोनियाजींना फोन करत असतो. असं ठाकरे यांनी म्हंटल आहे.
शरद पवारांचं किती मार्गदर्शन लाभत राज्य चालवण्याचा त्यांना भरपूर अनुभव आहे
सोबतच्या भेटी हा एक वेगळा अनुभव असतो. ते भेटतात तेव्हा काही कामं घेऊन येतात असं अजिबात नाही. कधी कधी त्यांचा फोन येतो की, उद्या काय करताय? आणि बहुतेक वेळा मग सगळं जुळत असेल तर त्यांची आणि माझी भेट होते. भेटीत ते त्यांचे जुने अनुभव सांगत असतात. लातूरला भूकंप झाला तेव्हा त्यांनी काय केलं होतं चीनचा विषय निघाला. संरक्षणमंत्री असतानाचे त्यांचे अनुभव त्यांचा चीन दौरा मग चीनच्या पंतप्रधानांसोबत काय चर्चा झाली जुन्या त्यांच्या अनुभवांच्या आठवणी ते सांगत असतात, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल आहे.