एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी लवकर कोसळेल अशी शक्यता वर्तवली जात असताना आज राज्यातील राजकीय नाट्यादरम्यान वर्षावर शिवसेनेने आपल्या आमदारांना बोलावलं आहे. याठिकाणी जमलेल्या 15 आमदारांसोबत संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला.
यावेळी संजय राऊत यांनी मोठे खुलासे केले आहेत. आमदारांचं अपहरण करून भारतीय जनता पक्षाने त्यांना आपल्यासोबत नेलं आहे. सर्वांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. भाजपच्या ताब्यातीला 21 आमदारांचा आमच्याशी संपर्क झाला असल्याचं राऊत म्हणाले आहेत.
ज्यादिवशी मुंबईला येतील तेव्हा 21 आमदार शिवसेनेसोबत असतील. सर्वांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. तर भाजपने नेलेल्या आमदारांपैकी 2 आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील परत आले आहेत, असं ते म्हणाले. इथे सर्व मिळून भाजपने अपहरण केलेले 23 आमदार मुंबईत येताच आपल्यासोबत येणार असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. महाविकास आघाडीचा विजय होईल इतका आकडा आमच्याकडे आहे, असा दावा ऱाऊतांनी केला आहे.