- विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळालं. विधानभवनाच्या गेटपासून पायऱ्यांपर्यंत हे दोन्ही नेते एकत्रित संवाद करत येताना पाहून अनेकांना धक्का बसला तर दुसरीकडे भविष्यात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र सत्तेत बसणार अशी चहरचा सुरु झाली होती. त्यात मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना फटकारल्यामुळे या चर्चेला आणखी वाव मिळाला. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, मला लोकसभेच्या लॉबीत अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जेपी नड्डा यांना भेटतात. रस्ता एकच असतो. विधानभवन असेल किंवा संसद इथं सत्ताधारी-विरोधक यांच्यासाठी एकच रस्ता असतो. अद्यापतरी देशात सत्ताधारी आणि विरोधकांसाठी वेगवेगळे रस्ते तयार झाले नाहीत. ज्यांना हवे असेल ते करू शकतात. त्यामुळे फडणवीस-ठाकरे भेट हा विषय नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच विधानभवनात जाताना उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकत्रित पुढे आले, संवाद करत विधानभवनाच्या पायऱ्यांपर्यंत गेले याचा अर्थ ते एकत्र येतील असं नाही. फडणवीस आणि ठाकरेंच्या वाटा अजिबात एकत्र येणार नाहीत, हे मी सांगतोय असं सांगत ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
प्रकरण असं की, अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेचे सदस्य असलेले उद्धव ठाकरे विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर गाडीतून उतरले. ठाकरे गटाचे काही आमदार त्यांना घ्यायला आले होते. त्यांच्याशी ते बोलत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताफा आला. ते गाडीतून उतरले तर समोर उद्धव ठाकरे. दोघांनी स्मित हास्य केले या दोन्ही नेत्याच्या एकत्रित दिसल्यामुळे नव्या चर्चाना उधाण आले होते.