मागच्या वर्षभरापासून रखडलेला शिंदे फडवणीस सरकारचा मंत्री मंडळ विस्तार पुढच्या आठवढ्यात होत असून यावरून ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खोचक टोला लगावला आहे. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना मंत्रीपद मिळालं तर महाराष्ट्रामध्ये मटक्याला अधिकृत परवानगी मिळेल असा खोचक टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवेयांनी लगावला.
ते हिंगोलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी संतोष बांगर यांच्यावर टीका केली. मागील काहीच दिवसांपूर्वी संतोष बांगर यांनी पुढील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मला शंभर टक्के मंत्रीपद मिळेल अशी माहिती दिली होती. त्यांच्या या वक्तव्यावर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्याबाबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
सध्याच्या सरकारइतकं अपयशी सरकार राज्यात कधीच राहीलं नाही. राज्यात भ्रष्टाचार सुरु आहे. शेतकऱ्यांचे कोणतंही काम होत नाही. शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. अतिवृष्टीची मदत देखील अद्याप झाली नाही. त्यामुळं हे सरकार महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारं सरकार असल्याची टीका दानवेंनी केली आता या टीकेला शिंदे गट काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.