अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. संसदेच्या या अर्थसंकल्पाकडून सामान्य वर्गाला अनेक अपेक्षा आहेत. मोदी सरकारकडून यंदाच्या वर्षी करामध्ये सवलत मिळण्याच्या अपेक्षा सध्या वेतनश्रेणीमध्ये येणाऱ्या वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहेत. या अर्थसंकल्पात केंद्र सरकार कोणकोणत्या आकर्षक घोषणा करणार तसेच या अर्थसंकल्पातून सामान्य माणसाला काय मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील मागणी केली आहे.
या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र तसेच मुंबईसाठी विशेष तरतूद करावी. तसेच हा अर्थसंकल्प आणि पैसा भाजपचा नसून लोकांचा आहे. “केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी एक वेगळी आणि स्वतंत्र भूमिका घ्यावी. मुंबईसाठीही केंद्राने वेगळी भूमिका घ्यावी. मोदी वारंवार मुंबईचा दौरा करत आहेत. याचा अर्थ हा आहे की, मुंबई महानगरपालिका हे त्यांचे लक्ष आहे. त्यांनी मुंबईत फक्त राजकारणासाठी न येता सोबत काहीतरी घेऊन यावे. मुंबईने सातत्याने देशाला काहीतरी देण्याचा प्रयत्न केला असे त्यांनी यावेळी बोलून दाखविले.
तसेच अनेक गरीब राज्यांचे पोट मुंबईमुळे भरले जाते. मुंबईत अनेक प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत. त्यामुळे या प्रकल्पांसाठी केंद्राची गरज आहे. त्यासाठी आम्ही सरकारला पत्राने व्यवहार केला आहे. त्यासंदर्भात पंतप्रधान आणि अर्थमंत्री विचार करतील. अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर नेऊन मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत आहे. लाखोंचे रोजगार देणारे उद्योग गुजरातमध्ये नेण्यात आले. या अर्थसंकल्पामधून काही भरपाई दिली जात असेल, तर आम्ही केंद्र सरकारचे आभार मानू.” असे संजय राऊत म्हणाले.