राष्ट्रवादीचे नेते तसेच महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात गुन्हे दाखल होते. ईडीच्या गुन्ह्यात त्यांना जामीन मिळाला होता ; पण सीबीआयच्या गुन्ह्यात त्यांना जामीन मिळाला नव्हता. त्यामुळे त्यांनी मुंबई हाय कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. दरम्यान, अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर न्यायाधीश एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यांच्यावर झालेले सर्व आरोप त्यांच्या वकिलांनी फेटाळून लावले. तसेच न्यायालयाकडून त्यांना जामीनही मंजूर करण्यात आला आहे. या निकालावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही यावर मत मांडले. “अनिल देशमुख हे भाजपच्या विखारी राजकारणाचे बळी आहेत.” असे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे भाजपवर हल्लाबोल केला आहे. “अनिल देशमुख यांना जामीन मिळाला याचे समाधान आहे. भाजपच्या विखारी राजकारणाचे ते बळी आहेत. विरोधकांमध्ये भीती पसरविण्यासाठी १२० धाडी टाकल्या व आतच ठेवण्याचा प्रयत्न केला. खुनाच्या आरोपीला माफीचा साक्षीदार व नं. १ ला संरक्षण हे गेल्या ८ वर्षांत देशातील विदारक चित्राचा भाग आहे.” असे ते म्हणाले.
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली.” असे ते म्हणाले होते. या वादग्रस्त विधानामुळे त्यांच्या अंगावर शाही फेकण्यात आली. त्यावरही सावंत यांनी ट्विटद्वारे मत मांडले. “शाई फेकून केलेल्या विरोधापेक्षा शाईने लिहून केलेला विरोध अधिक प्रभावी, व्यापक व लोकशाहीला अभिप्रेत असणारा असतो, हे आंदोलकांनी लक्षात घ्यावे. शाई फेकण्याला जीवे मारण्याचा गुन्हा म्हणणे हे शाईफेकीला तात्त्विक आणि नैतिक आधार देते, हे शासनाने लक्षात घ्यावे, कारवाई आणि बदला यात फरक असतो.” असे ते म्हणाले.