राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असून, पक्ष सोडण्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात जोरदार चहरचा सुरु झाली होती. मात्र, खुद्द पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी यावर स्पष्टीकरण देत खुलासा केल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचे बोलले जात आहे. मात्र, यातच आता अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यावरून प्रतिक्रिया येत असून, शिंदे गटाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी विचारधारा बदलली तर स्वागत आहे, असेही शिंदे गटाच्या नेत्यांनी म्हटले आहे.
शिंदे गटातील नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी अजित पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजितदादांची विचारधारा जर बदलली, त्यांनी आमची विचारधारा जर स्वीकारली तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील त्यासोबत आम्ही राहू. परंतु, प्रश्न विचारधारेचा आहे, सांगत उदय सामंत यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार भाजप-शिवसेनेसोबत आल्यास काहीच अडचण नसल्याचे सूचित केले आहे.
अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर उरलेल्या शिवसेनेने बोलले पाहिजे. काँग्रेसने बोललेले पाहिजे. शिवसेना ठाकरे गट सांगतात की, आमचा मुख्यमंत्री होणार, काँग्रेस सांगते आमचा मुख्यमंत्री होणार, यावरून आवळलेली वज्रमूठ एकत्र नाही हे सिद्ध होते. एका मुलाखतीमध्ये अजित पवार यांनी सात वेळा नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे, असेही ते म्हणाले. तसेच अजित पवार हे विरोध पक्षनेते आहेत. त्यामुळे सरकार जाणार हे त्यांना सांगावच लागते. पुढील दीड वर्ष मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहतील. आगामी काळात शिंदे -फडणवीस यांच्याच नेतृत्वाखालीच राज्यात सरकार स्थापन होईल, असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला