एकनाथ शिंदे यांनी आपल्या बंडखोरांचा पाठिंबा महाविकास आघाडीकडून काढून घेतल्यामुळे आघाडी सरकार कोसळले अशातच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर दुसरीकडे आघाडीच्या नेत्यांनी कार्यालये आणि बंगले खाली करण्यास सुरवात देखील केली.
अशातच राज्याच्या महिला व बाल विकास विेभागाच्या मंत्री तथा अमरावती पालकमंत्री म्हणून कार्यभार सांभाळल्यानंतर आज मुंबईतील मंत्रालयीन कार्यालयातील सहकार्यांचा निरोप घेताना ॲड यशोमती ठाकूर यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार केला. स्वत औक्षण करत, शाल पांघरत प्रधान सचिव, खाजगी सचिव, विशेष अधिकारी, पोलिस स्टाफ यांचे पासून शिपाई, स्वयंपाकी, सुरक्षा रक्षक यांचा सत्कार केला.
अतिशय भावपुर्ण वातावरण झाले असताना ॲड ठाकूर म्हणाल्या की, आपण सर्वांनी गेले अडीच वर्ष दिलेली साथ मोलाची आहे. आपण सर्वांनीच सामान्यांना दिलासा देणारे निर्णय केले, जनतेच्या भल्याची कामे केली. आता अधिकारी, कर्मचारी असे नाते राहिले नाही तरी आपले ऋणानुबंध आयुष्यभराचे असणार आहेत. मी कायम तुमच्या सोबत असेन असे ही आश्वस्त केले. सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.