सध्या AC लोकॅलवरून वाद सुरु झाले असून सर्वसामान्य नागरिकांची लोकल आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे सध्या AC लोकलवरून राजकारण सुरु झाले असून याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी थेट केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिले आहे तर दुसरीकडे लोकलने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य गरीब माणसांच्या, कष्टकऱ्यांच्या बाजूने आपण असून ज्या 10 टक्के लोकांना AC लोकल हवी आहे ते माझ्या विरोधात गरळ ओकत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
कळवा रेल्वे स्थानकावर गेल्या शुक्रवारी सकाळी प्रवाशांनी आंदोलन केले होते. संतप्त प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून एसी लोकल रोखून धरली. यामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. प्रवाशांच्या आंदोलनाची माहिती मिळताच आरपीएफ आणि जीआरपीच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बळाचा वापर करून गर्दी बाजूला केली. तसेच सात प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले.
कळवा कार शेड इथून ज्या लोकल निघतात पुढे त्या ठाणे ते सीएसएमटीला जातात. कळव्यातील अनेक प्रवासी कारशेडमध्येच बसून येतात. मात्र कळवा कारशेडमधून निघालेली एक लोकल ही एसी लोकल असल्याने त्याचे दरवाजे बंद होते. एसी लोकलचं तिकीटही जास्त असल्याने या गाडीत प्रवाशांना चढता आले नव्हते. साधी लोकल सोडण्याऐवजी एसी लोकल सोडल्याने प्रवासी संतापले होते. संतापलेल्या या प्रवाशांनी ट्रॅकवर उतरत एसी लोकल अडवून धरली होती.