गुजरात, हिमाचल आणि पोटनिवडणुकांचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत जे जे जिंकले त्या सर्वांचे अभिनंदन! महत्त्वाची गोष्ट हीच, आता तरी महाराष्ट्राच्या निवडणुका लावा. घाबरायची काय गरज आहे.महाराष्ट्रातही लोकशाही पद्धतीने निवडणुका होऊन जाऊ द्या, असे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मिंधे सरकारला दिले.
गुजरातमध्ये भाजपला यश मिळाले, तर हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसचा विजय झाला. या पार्श्वभूमीवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, लोकशाहीत एका राज्यात एक, दुसऱया राज्यात दुसरा पक्ष आला. आता वेळ आली आहे ती महाराष्ट्रात निवडणुका घेण्याची. कारण, महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार सत्तेत बसले आहे असे सुद्धा यावेळी त्यांनी बोलून दाखविले.
40 आमदार व 12 खासदारांच्या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या, मात्र त्या झालेल्या नाहीत. एवढा मोठा विजय प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्रात निवडणुका घेण्यास काहीच हरकत नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे आदी राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुकांकडेही त्यांनी लक्ष वेधत लोकशाही पद्धतीने निवडणुका घेण्याचे धाडस दाखवा, असे आव्हानच त्यांनी राज्यातील सत्ताधाऱयांना दिले.