शिवसेना पक्षातून ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक पालिकांमधील नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सामिल होत आहेत. शिवसेना खासदार देखील निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे नव्याने शिवसेना उभी करत आहेत.
या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे शिवसेना वाचवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. काल त्यांनी निष्ठा यात्रेला सुरवात केली. दरम्यान आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेवर मनसे नेते गजानन काळे यांनी टीका केली.मनसे नेते गजानन काळे यांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावरुन मिलिंद नार्वेकर यांना लक्ष केले आहे. “अहो ते संकटमोचक मिलिंद नार्वेकर गेलेत की आहेत? निष्ठा यात्रेत दिसले नाहीत म्हणून तेवढं आपलं विचारलं. त्यांनी प्रतिज्ञापत्र द्यायला नकार दिला, असं ऐकण्यात आलय”, असे ट्विट गजानन काळे यांनी केली आहे.
यावरूनच मनसेनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर देखील आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो पोस्ट करत टीका केली आहे.”नियतीचा खेळ! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला “संपलेला पक्ष” म्हणून हिणवलेले आदित्य ठाकरे आज “पक्ष नसलेला” माणूस झाले आणि चिन्ह देखील गमावण्याची वेळ आल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील चेष्टेचा विषय बनले. म्हणून एखाद्याच्या वाईट काळात कधीच कुणाला हिणवू नये.” शी पोस्ट मनसे वृत्तांतवर केली आहे.