नागपूर |
गत 20 वर्षांपासून आपण विधिमंडळाचे कामकाज बघत आहोत. नागरिकांच्या प्रश्नावर चर्चा करणे, लोकहिताचे विधेयके पारित करणे हा अधिवेशनाचा खरा आत्मा आहे, असे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
विधिमंडळ कामकाजासाठी मुंबई येथून आलेल्या पत्रकारांशी सुयोग पत्रकार निवास येथे संवाद साधतांना त्या बोलत होत्या. या अधिवेशनात चांगले कामकाज करण्याबाबत विश्वास व्यक्त करून त्या म्हणाल्या, विदर्भातील तसेच इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर चांगली चर्चा अपेक्षित आहे. विधिमंडळाच्या चौकटीत चांगले काम करण्याचा प्रयत्न आहे. पीठासीन अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिलेले निर्देश पाळण्याचे बंधन त्यांच्यावर असून त्याचा अहवाल वेळेत सादर करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर दिलेल्या सुचनांचे 99 टक्के पालन झाल्याचेही त्यांनी सांगितले.
विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सचिव तथा महासंचालक जयश्री भोज, संचालक (प्रशासन) हेमराज बागुल, सुयोग शिबिरप्रमुख विवेक भावसार, मंत्रालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर आदी यावेळी उपस्थित होते.