कोल्हापूर |
हणबरवाडी (ता. करवीर) येथील माजी सरपंच सुप्रिया बाजीराव वाडकर (वय ३५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाडकर यांच्या वडिलांनी इस्पुर्ली पोलिसांत फिर्याद दिली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
बाजीराव वाडकर हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. साधारणतः दहाच्या दरम्यान सुप्रिया यांनी घरी कोणी नसल्याचे पाहून गळफास घेत आत्महत्या केली. सुप्रिया वाडकर काही वेळानंतर शेजारील महिला त्यांच्या घरी गेली असता हा प्रकार निदर्शनास आला. तेव्हा तातडीने त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात नेले, पण उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही घटना सुप्रिया यांच्या माहेरी (सैनिक टाकळी, ता. शिरोळ) येथे कळविण्यात आली.
पण, सुप्रिया यांचे आई-वडील बाहेरगावी असल्याने त्यांनी आम्ही आल्याशिवाय मृतदेह ताब्यात घ्यायचा नाही, असे सांगितल्याने दिवसभर दोन्हीकडील नातेवाईक रुग्णालयाच्या आवारात बसून होते. रात्री नऊच्या दरम्यान वडिलांनी इस्पुर्ली पोलिसांत तक्रार दिली. सुप्रिया यांच्या मागे पती, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.