जेव्हापासून देशात बीजेपीचे सरकार आले आहे तेव्हापासून अल्पसंख्याक समाज हा दडपणाखाली वावरत आहे. बीजेपीच्या काळात मॉबलिंचींगचे प्रकार वाढले असून त्यात मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचे निरपराध बळी गेले आहेत. सोलापूरचा मोहसीन शेख हा मॉबलींचिंगचा पहिला बळी ठरला. त्याचा राग आणि दुःख अजूनही अल्पसंख्याक समाजात आहे आणि ते तसेच राहिले पाहिजे,अन्यथा आपल्या भावनांना काडीमात्र किंमत उरणार नाही.असा सावधानतेचा इशारा अल्पसंख्याक हक्क समितीचे महाराष्ट्र राज्याचे निमंत्रक ऍड. एम.एच. शेख यांनी दिला.
१८ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक अधिकार दिन म्हणून पाळला जातो.त्यानिमित्त अल्पसंख्याक हक्क संघर्ष समितीतर्फे शहापूर चाळ येथील शहिद अश्फाकउल्लाह खान सभागृहात “अल्पसंख्यांक समाज: कल आज और कल” या शीर्षकाखाली एक मेळावा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी ऍड एम.एच. शेख बोलत होते. पुढे बोलताना शेख यांनी संविधानात अल्पसंख्याक समाजाला दिलेल्या विशेष अधिकाराचे विवेचन केले. अल्पसंख्यांक समाजाबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असून तशी तरतूद भारतीय राज्यघटनेत आहे असेही ते म्हणाले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर हे होते. आडम मास्तर यांनी अल्पसंख्यांक समाजावर होत असलेल्या अन्यायावर भाष्य केले. ते म्हणाले 2001 साली गुजरातमध्ये सीमीच्या कार्यकर्त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली तुरुंगात डांबण्यात आले, परंतु २० वर्षानंतर न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली. गुजरात शासनाच्या हलगर्जीपणामुळे भर तारुण्यातील वीस वर्षे वाया गेल्याने या तरुणांचे आयुष्य बरबाद झाले. हे नुकसान कोण भरून काढणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मोदी सरकारच्या एनआरसी आणि सीएए कायद्यामुळे 20 करोड मुस्लिम जनता भीतीच्या सावटाखाली आहेत, जोपर्यंत लाल झेंडा आहे तोपर्यंत मुस्लिमांच्या केसाला धक्का लावू देणार नाही अशी प्रतिज्ञा आडम मास्तर यांनी घेतली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ख्रिश्चन समाजाचे धर्मगुरू विकास रणशिंगे हे होते, ते म्हणाले संकट ही येत असतात, संकटे कधीच संपत नाहीत. या संकटावर मात करून आपण मार्ग काढायचा असतो. मेळाव्याचे प्रास्ताविक युसुफ मेजर यांनी केले तर मोहम्मद हनीफ सातखेड यांनी आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी मंचावर नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख, सिद्धाप्पा कलशेट्टी,सुनंदा बल्ला,बाबूलाल फणीबंद,इम्रान मंगलगिरी, खालिक सय्यद,मतीन बागवान,आरिफ पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.तर जाफर मुल्ला,सद्दाम शेख,फेरोज पठाण,युसूफ पठाण,अबुहुरेरा शेख,अब्बास यादगीर,अन्वर शेख,……इरफान कल्याणी आणि मोठया प्रमाणात अल्पसंख्याक बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इलियास सिद्दिकी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आसिफ पठाण, इलियास सिद्दिकी ,अकिल शेख,दाऊद शेख,नरेश दुगाणे, मुन्ना कलबुर्गी,युसूफ शेख, वसीम मुल्ला, विल्यम ससाणे, बापू साबळे,हसन शेख, कादर शेख,जावेद सगरी,राजेश काशीद,आदींनी परिश्रम घेतले.