मुंबई |
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य (मिलेट्स) वर्ष घोषित केलंय. त्यामुळे भरडधान्याचं उत्पादन, वापर आणि त्याची उपयुक्तता जगासमोर आणण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतील रुईया महाविद्यालयात दोन दिवसांच्या आतंरराष्ट्रीय भरडधान्य परिषदेचं उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, भरडधान्यांबाबत विद्यार्थ्यांमध्येही जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यानुसार रुईया महाविद्यालयात आयोजित या परिषदेला मिळालेला प्रतिसाद हुरूप वाढवणारा आहे. भरडधान्य हे अन्नाचा एक महत्वाचा स्रोत असून खाद्यपदार्थ म्हणून त्याची निवड करणे काळाची गरज आहे. भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन त्याचे ब्रँडिंग करणे गरजेचे असून त्यासाठी ही आंतरराष्ट्रीय परिषद महत्त्वाची ठरणार असल्याचे, चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
या परिषदेमुळे आरोग्यदायी आहारामध्ये भरडधान्याचे महत्त्व आणि उपयुक्तता याबाबत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना माहिती आणि या क्षेत्रात संशोधन करण्यास प्रोत्साहन मिळेल, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
उद्घाटनास रुईयाच्या प्राचार्य डॉ. अनुश्री लोकूर, पद्मश्री खादर वल्ली, व्यवस्थापकीय परिषदेचे अध्यक्ष एस. पी. मंडळी – Adv. एस. के. जैन, श्रीकृष्ण चितळे, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष ॲड. मिहीर प्रभुदेसाई, उपप्राचार्य डॉ. वर्षा शुक्ला, प्रा. कामिनी दोंदे यांच्यासह विद्यार्थी मित्रही उपस्थित होते.