पुणे, ०८ जानेवारी : राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघातील स्वारद फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर आणि उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचे आभार मानले. तसेच, तरुणांनी मोठ्या प्रमाणात उद्योजकतेकडे वळावे, यासाठी शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी येवेळी केले. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि, आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही हाच आग्रह करतो की, कोणत्याही निमित्ताने ठिकठिकाणी रक्तदान शिबिर राबवायला हवेत. कारण रक्ताची आवश्यकता मनुष्याला सातत्याने लागतच असते. आमच्या सर्व कार्यकर्त्याना हा आग्रह असतो कि त्यांनी कुठल्या ना कुठल्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करून खूप बॉटल्स कलेक्ट केल्या पाहिजेत.
चंद्रकांत पाटील यांनी पुढे म्हटले कि, रक्ताची गरज हि सातत्याने लागणार आहे. एका माणसाच्या शरीरातून रक्त काढून दुसऱ्या व्यक्तीला ते देणं हा एकच पर्याय आहे. अपघात मोट्या प्रमाणात वाढत आहेत, आजारपणं , ऑपरेशन्स होत आहेत. त्यामुळे ब्लड बँकेला शॉर्टेज असते. रक्तदान शिबिरांचे आयोजन हि काळाची गरज असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.