चालू शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी प्राध्यापक भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई |
राज्यातील प्राध्यपक भरती प्रक्रियेवर गुरुवारी विधानसभेत चर्चा करण्यात आली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत भरती प्रक्रियेवर भाष्य केले. राज्यात पहिल्या टप्प्यातील 2 हजार 88 प्राध्यापक पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली असून यापैकी जवळपास 1100 पदांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. चालू शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि , राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीकरिता सुकाणू समितीसमवेत स्वायत्त महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेण्यात आली. राज्यातील 148 महाविद्यालयांना स्वायत्तता देण्यात आली आहे. त्यांना शैक्षणिक वर्षांपासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विधानसभेत सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यांवर शालेय शिक्षण, क्रीडा विभाग, आदिवासी विकास विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महिला व बालविकास विभागावर चर्चा झाली. यावर आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, क्रीडा मंत्री गिरीष महाजन, मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर दिली.