कोल्हापूर जिल्ह्यात गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात कायदेशीर मार्गाने पुनर्विचार याचिका दाखल करणार – चंद्रकांत पाटील
कोल्हापूर |
कोल्हापूर जिल्ह्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्वपूर्ण माहिती दिली. यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात आम्ही कायदेशीर मार्गाने पुनर्विचार याचिका दाखल करणार आहोत, अशी माहिती दिली. तसेच केंद्र सरकारकडेही यासंदर्भात विनंती करणार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे प्रशासनाने अतिक्रमण पाडायची घाई करू नये, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या विरोधी मंडळींनी असे सुरु केलय कि, गायरान जमिनीवरील अतिक्रमण आम्ही काढून देणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर असं म्हणणं हा सुप्रीम कोर्टाचा अवमान आहे. आम्ही सुद्धा सर्वसामान्य माणसाच प्रतिनिधित्व करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला कि, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची पुनर्विचार याचिका आपण दाखल करूया, आणि बरोबरीने केंद्र सरकारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले पाहिजे, विनंती केली पाहिजे कि, कायद्यामध्ये काही ना काही बदल करा, असे पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील यांनी पुढे म्हटले कि, नव्याने अतिक्रमणे झाली तर त्याला एंटरटेन करू नका, पण जी जुनी आहेत त्याबाबत सकारात्मक विचार करायला हवा. त्यामुळे मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सूचना द्यायला लावतो कि तुम्ही लगेच बुलडोजर लावून अतिक्रमण पाडू नका, अतिक्रमण पडायची घाई करू नका, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी लोकांना आवाहन केले कि, कृपया घाबरून जाऊ नका, आणि विरोधी पक्षांच्या उचकवण्याला बळी पडू नका असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.