मुंबई |
प्राचीन भारत जागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध होता. आपल्याकडे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी, ओदंतपुरी आणि सोमपुरा अशी प्रसिद्ध विद्यापीठे होती. जिथे हजारो वर्षांपासून जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक शिक्षणासाठी येत असत. आजचे उच्च शिक्षण त्या विद्यापीठांच्या उंचीवर नेऊ शकतो का, याचा विचार करायला हवा, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे व्यक्त केले.
नेरुळ येथील डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचा १७ वा दीक्षांत समारंभ आज झाला. यावेळी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकमत ग्रुपचे चेअरमन विजय दर्डा, डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती तथा अध्यक्ष डॉ. विजय पाटील, प्र कुलपती शिवानी पाटील, कुलगुरू वंदना मिश्रा चतुर्वेदी, आदी यावेळी उपस्थित होते.
सामाजिक, वैद्यकीय सेवा व आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रातील सेवेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तसेच सामाजिक कार्यासाठी श्री. दर्डा यांना राज्यपाल महोदयांच्या हस्ते मानद डॉक्टरेट (डी. लिट.) देण्यात आली. या कार्यक्रमास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री महोदयांचे वडील श्री. संभाजीराव शिंदे, पत्नी लता शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे व श्री. दर्डा यांना डी. लिट. पदवी मिळाल्याबद्दल राज्यपालांनी दोघांचे अभिनंदन केले.