खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. याच मुद्द्यावरून, आता आमदार रवी राणा यांनीही संताप व्यक्त केला आहे. राहुल गांधी सावरकरांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करतात आणि उद्धव ठाकरे त्यांचे समर्थन करतात. यामुळे या दोघांवरही राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना राणा यांची जीभ घसरली आणि ‘उद्धव ठाकरे, यांनी चुल्लूभर पाण्यात डुबून मरायला पाहिजे,’ असे राणा यांनी म्हटले आहे.
राणा म्हणाले, “स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्रजांनी काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली होती. देशावर प्रेम करणाऱ्या आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीर सावरकरांवर वक्तव्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या वक्तव्याचे समर्थन करणारे उद्धव ठाकरे, यांनी या ठिकाणी चुल्लूभर पाण्यात डुबून मरायला पाहिजे”. अशी टीका त्यांना ठाकरे यांच्यावर केली होती.
पुढे राणा म्हणाले की, “राहुल गांधी अशाप्रकारचे वक्तव्य करतात आणि उद्धव ठाकरे त्यांचं समर्थन करतात. यामुळे या दोघांवरही राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. ही माझी मागणी आहे. तसेच राहुल गांधींनी संपूर्ण देशाची माफी मागायला हवी. याच बरोब उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्राची माफी मागायला हवी. अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू”, असा इशाराही राणा यांनी दिला आहे