Latest Marathi News

BREAKING NEWS

उद्धव ठाकरे , नाकर्त्या कारभाराबद्दल महाराष्ट्राची माफी मागा; वाचा कोणी केली टीका

0

ठाणे | कोरोना काळात देशात सर्वात जास्त कोविड मृत्यू महाराष्ट्रात झाले. ठाकरे सरकारच्या वसुलीबाज कारभाराला कंटाळून अनेक उद्योग राज्याबाहेर गेले. सरकारी अनागोंदीमुळे महाराष्ट्र रसातळाला गेला तरी अजूनही उद्धव ठाकरे आपल्या नाकर्त्या कारभाराबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत. आपल्या नाकर्त्या , भ्रष्ट कारभाराबद्दल महाराष्ट्राची माफी मागा आणि सत्ता असतानाही घरी बसलात तसे घरीच बसा, अशी टीका भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी सोमवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे झालेल्या सभेत ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाषणावर टीका केली. पंचवीस वर्षे राजकारणात असूनदेखील आजही स्वतःचे स्थान किंवा कर्तृत्व दाखविता न आल्याने दिवंगत पित्याच्या पुण्याईवर लोकांसमोर जाताना आपल्या नाकर्तेपणाची लाज वाटावयास हवी, असा खोचक टोलाही कांबळे यांनी लगावला. जगातील सर्वात मोठा पक्ष आणि देशातील सर्वाधिक जनाधार असलेल्या भाजपला पोकळ आव्हाने देण्याआधी त्यांनी मागे वळून आपल्या पाठीशी काय उरले आहे हे तपासावे असा सल्लाही त्यांनी दिला. आता पक्ष आणि चिन्ह गमावल्यावर पाकिस्तानकडून मान्यता घेण्यापर्यंत लाचारीची मजल गेलेली पाहून बाळासाहेबांना काय वाटले असेल, असा सवाल कांबळे यांनी केला.

मी घरी बसून सरकार चालवले असे ठाकरे आजही सांगतात, पण या घरी बसण्यामुळेच महाराष्ट्र वाऱ्यावर पडला, असा आरोपही त्यांनी केला. सभेला गर्दी करणारी जनता मतदान मात्र करत नाही, अशी खंत दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर सभेतच व्यक्त केली होती. गर्दी पाहून हुरळणारे उद्धव ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे ते उद्गार आठवावेत असेही ते म्हणाले. तुमचे नाव शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांशी जोडले नसते तर मला काडीची किंमत नाही, असे उद्धव ठाकरे तुम्ही स्वतः म्हणतात. आता हिंमत असेल तर स्वतःचे नाव वापरून जनतेसमोर या, असे आव्हानही कांबळे यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.