एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर सेनेमध्ये गळती सुरु झाली आहे. अशातच राज्यभरातून शिंदे गटाला पाठिंबा वाढत आहे. ही हानी भरून काढण्यासाठी आदित्य ठाकरे यांचे झंझावती दौरे सुरू आहेत. युवासैनिक आणि शिवसैनिकांची मोट बांधण्याचे जोरकस प्रयत्न केले जात आहेत.
मात्र, आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आदित्य ठाकरेंच्या सभांना होणाऱ्या गर्दीवरून भाजपने वर्मावर बोट ठेवले असून, तुम्ही कितीही गर्दी करा, मते पडत नसतील तर अर्थच नाही, असा टोला लगावण्यात आला आहे. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या ठिकठिकाणी होणाऱ्या सभांना मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. त्यापेक्षा मोठी गर्दी जमवून दाखविण्याचे आव्हानही दिले गेले.
अशातच आता भाजपचे युवा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या गर्दीमागील गणित सांगत ठाकरे यांच्यासह त्यांच्या गटात उरलेल्यांवर निशाणाही साधला आहे. गर्दी आणि सध्याची राजकीय गणिते सांगून राजकारणातील वास्तवाची स्वानुभावरून जाणीव करून देण्याचा प्रयत्नही विखे पाटील यांनी केला आहे.
सभेची गर्दी ही कॅमेऱ्याची कमालही असू शकते. ज्या पद्धतीने दाखवायचे, तसे चित्रिकरण केले असावे. अनेक राजकीय नेत्यांच्या सभांना गर्दी होते. लोकांना काय नवेपण आहे ते पाहण्याचे कुतूहल असते. ठाकरे यांना प्रतिसाद मिळत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही कितीही गर्दी केली आणि मते पडत नसतील तर त्याला अर्थ नाही, असा टोलाही त्यांनी लगावला