शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जेव्हापासून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला तेव्हापासून त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप हे होतच असतात; परंतु आता भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी एक खळबळजनक ट्विट करत ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
ठाकरे घरातल्या एका सुंदर व्यक्तीमुळे चव्हाण आडनाव असलेल्या एका व्यक्तीचा खून करण्यात आला का? असा प्रश्न निलेश राणेंनी उपस्थित केला आहे. यासोबतच, स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा मृत्यू नेमका कसा झाला? त्यांच्या मृत्यूच्या दिवशी कर्जतच्या फार्म हाऊसवर काय झाले होते? हे महाराष्ट्राला कळले पाहिजे, असे ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
दरम्यान, ट्विटनंतर निलेश राणेंनी पत्रकारांशी संवाद साधला त्यामध्येसुद्धा उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका करत ते म्हणाले, “ठाकरेंनी आता त्यांची औकात ओळखावी, ते आता शून्य झाले आहेत. त्यांना आता कुत्रेही विचारत नाही. त्यामुळे त्यांनी राणेंच्या नादाला लागायचे नाही. आमच्यावर भुंकायला जे कुत्रे ठेवलेत, त्यांना पण ठाकरेंनी आवरायला सांगितले पाहिजे. नाहीतर जाहीरसभा घेऊन सर्व गोष्टी बाहेर काढेन.” असा इशारादेखील राणेंनी केला आहे. तसेच निलेश राणे यांचे हे ट्विट वेगाने व्हायरल होत आहे.