मुंबई | अरुणाचल प्रदेमधील तवांग सेक्टरमध्ये चिनी सैन्याच्या घुसखोरीचा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला असला तरी चीनच्या घुसखोरीला रोखताना दोन्ही बाजूने संघर्ष झाला. यावर सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अग्रलेखात म्हटले की, चिनी सैन्य सीमेवरून हटायला तयार नाही,’ अशी कबुली गेल्याच महिन्यात खुद्द आपल्या लष्करप्रमुखांनीच दिली होती .
त्यामुळे सीमेवर तणाव निर्माण होऊ शकतो , असा इशाराही त्यांनी दिला होता . फक्त महिनाभरात जर तो खरा ठरत असेल तर त्याची जबाबदारी आधीच्या सरकारांची की सध्याच्या सरकारची ? मागे जे झाले ते झाले , पण आता चीनच्या सीमेवर जे घडले , जे घडत आहे त्याचे काय ? ‘ मोदीनॉमिक्स ‘ प्रमाणेच मोदी सरकारच्या(PM Modi)’ यशस्वी ‘ परराष्ट्र धोरणाचे ढोल वाजवता ना , मग कश्मिरी पंडितांचे टार्गेट किलिंग आणि गलवान – तवांगमधील चिनी घुसखोरी याची जबाबदारीही घ्या . त्यासाठी आधीच्या सरकारांकडे बोट दाखवून पळ काढू नका . तुमची जबाबदारी तुम्हाला घ्यावीच लागेल, असे राऊत म्हणाले.
चीनविरोधात मोदी सरकार ‘जशास तसे’ धोरण राबवीत आहे. चिनी सीमेवर हे सरकार तोडीस तोड संरक्षणसिद्धता करीत असून येथील सीमाभागात पायाभूत सुविधांचे जाळे तर 2014 नंतरच घट्ट विणले गेले, असे ‘दाखवायचे दात’ केंद्र सरकारची भक्त मंडळी येताजाता चमकवीत असते. मात्र अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर 9 डिसेंबरच्या रात्री जे घडले त्याने या दाखवायच्या दातांची ‘दातखीळ’ बसली आहे. चीनने पुन्हा त्याचे ‘खायचे दात’ दाखविल्याने केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे सगळेच दावे फोल ठरले आहेत. अरुणाचल प्रदेशमधील तवांग सीमेवर 9 डिसेंबरच्या रात्री चिनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. हिंदुस्थानी सैनिकांनी तो हाणून पाडला. चिन्यांना परत माघारी जाण्यास भाग पाडले, असे अग्रलेखात राऊत म्हणाले.