राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला यावर आता महाराष्ट्रातून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहे अशातच आता शिवसेनेच मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून कोश्यारीवर टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांना घालवले नसते तर जनता एक दिवस राजभवनातच घुसली असती. इतका संताप त्यांच्याविषयी निर्माण झाला होता.
कोश्यारी यांची जागा झारखंडचे राज्यपाल रमेश बैस यांनी घेतली आणि तेदेखील मनाने व रक्ताने भाजपचे स्वयंसेवकच आहेत. त्यावर नंतर बोलू’ असं म्हणत शिवसेनेनं नव्या राज्यपालांचं स्वागत करत भाजपवर निशाणा साधला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा अखेर राजीनामा स्वीकारला असून त्यांच्या जागी रमेश बैस यांची नियुक्ती केली आहे. या निर्णयावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून स्वागत आणि टीकाही करण्यात आली.
‘ महाराष्ट्रात शिवसेनेशी लढतानाही मोदी एकटे नव्हते, तर राज्यपाल कोश्यारी त्यांच्या ‘गोल्डन गँग’चे सदस्य होते. या ‘गोल्डन गँग’च्या सदस्यांना लाभाची पदे व आमिषे देऊन लढाईला उतरणे ही काही मर्दुमकी नाही. राज्यघटनेची व तिच्या रक्षकांची इतकी मानहानी कधीच झाली नव्हती. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांचे स्वागत करताना थोडा कोळसा उगाळावा लागला. कारण चंदन उगाळण्याचे दिवस संपवले गेले आहेत, असा टोला शिवसेनेनं भाजपला लगावला.
‘नव्या राज्यपाल नियुक्त्यांत एक तेजस्वी व चमकदार नाव आले. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अब्दुल नझीर हे ते नाव. त्यांना आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आता हे सन्माननीय नझीर कोण, तर अयोध्येतील राममंदिराचा निकाल देणाऱ्या घटनापीठाचे ते सदस्य होते व अलीकडेच ‘नोटाबंदी’ प्रकरणात मोदी सरकारला क्लीन चिट देणाऱ्या खंडपीठावरही न्या. नझीर होते. तेच न्या.नझीर आता सरकारी कृपेने आंध्रच्या राजभवनात पोहोचले आहेत’ असा टोलाही सेनेनं लगावला.