एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आमदारांनी बंडखोरी करत शिवसेनेला धक्का दिल्यानंतर शिवसेनेचे अनेक खासदारही बंडाचा झेंडा हाती घेण्याच्या विचारात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. शिवसेनेचे लोकसभेतील अनेक खासदार भाजपाशी जुळवून घेण्यासाठी उत्सुक असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेना आणि भाजपा यांच्यातील नैसर्गिक युती व्हावी, तसेच त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असं मत मांडलं आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना हेमंत गोडसे यांनी सांगितले की, आदिवासी महिला देशाची राष्ट्रपती होतेय, त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यावा, असं मत बऱ्याचशा खासदारांनी व्यक्त केलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यावर सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले. मी नाशिकचा खासदार म्हणून ८ वर्षे काम करत आहे. कुठलंही काम करायचं ठरलं तर राज्य आणि केंद्र हे संयुक्तपणे करत असतं. भाजपा आणि शिवसेना यांच्यातील युती नैसर्गिक युती आहे.
पुढे बोलताना गोडसे म्हणाले की, नाशिक लोकसभेचा विचार केला या मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी नाशिक शहरातील तीन आमदार हे भाजपाचे आहे. तर ग्रामीण भागातील तीन आमदार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत. ते शिवसेनेविरोधात लढून निवडून आलेले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी कायम ठेवली तर विधानसभा निवडणुकीच्या वेळी ते अडचणीचं ठरेल. शिवसेनेचा उमेदवार काय करेल, हा प्रश्न उपस्थित होईल, अशी भीती गोडसे यांनी व्यक्त केली.